चिखली (बातमीवाला): भारतीय जनता पक्ष देशातील लोकांना एकत्र आणण्याऐवजी त्यांच्यात फूट पाडण्याचे काम करत आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे राज्यातील नागरिकांचे उत्पन्न कमी झाले आहे, तर तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. भाजपने लोकशाहीला धाब्यावर बसवून हुकूमशाही आणली आहे, आणि चिखलीतील शांत राजकीय वातावरणही बिघडवले आहे. महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांचा प्रारंभ मी चिखलीपासून करत आहे, आणि इथे मला काँग्रेसचाच नगराध्यक्ष पाहिजे, असा ठाम निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी व्यक्त केला.
९ नोव्हेंबर रोजी रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात चिखली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यात राहुलभाऊ बोंद्रे सारखा प्रेमळ आणि आदरयुक्त बोलणारा जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली तरीही ते रात्रंदिवस पक्षाच्या संघटनेला प्राधान्य देत आहेत. जिल्ह्याची जबाबदारी मी स्वीकारतो, असे सांगणारे ते जबाबदार नेते आहेत. चिखलीकरांनी त्यांच्यापाठीमागे उभे राहुन चिखलीत काँग्रेसचाचा झेंडा फडकवा, आणि त्या सत्काराची संधी मला द्या, असे आवाहनही हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ म्हणाले की, चिखलीत माय- मावल्यांना आता केव्हाही उखाणे घ्यावे लागत आहे. त्यात भरीस भर म्हणून पुरुषमंडळीही उखाणे घेताना दिसत आहे. कुठलीही पूर्तता न करता लाव फोटो अन् कर भूमिपूजन असा प्रकार सुरु आहे. शनिवार, रविवारी कार्यालयात बोलावून जनतेला वेठीस धरल्या जात आहे. एकंदरीत चिखलीत आमदार पदाचे थैमान असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थात प्रशासक राज लावून भाजपाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको होत्या मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल चार वर्षानंतर निवडणुका होत आहे. सत्ताधाऱ्यांनी शहराच्या स्वच्छतेचा कचरा केला असून भ्रष्टाचाराचा निधी कोणाच्या घरात गेला ? असा प्रश्न जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केला. शहराच्या स्वच्छतेचे कंत्राट ७५ लाखांवरुन अडीच कोटीवर नेण्यात आले. स्वामी विवेकानंदाचे स्मारक, छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे सौंदर्यीकरण, विविध रस्त्यांच्या ठेक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे राहुलभाऊ बोंद्रे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.













