बातमीवाला: देऊळघाट ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, सर्वसामान्यांचे प्रश्न सातत्याने मांडणारे आणि कार्यकर्त्यांच्या बळावर उभे राहिलेले कर्तव्यदक्ष नेते म्हणून स्व. अजितदादा पवार यांची ओळख होती, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
हे पण वाचा:- भ्रष्टाचार उघड करणं आज गुन्हा का ठरतंय? सत्य एकटं का पाडलं जातंय…?
उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत राज्याच्या विकासाला चालना दिली. शिस्तप्रिय नेतृत्व, कामाला सर्वोच्च प्राधान्य, पारदर्शक प्रशासन आणि कार्यकर्त्यांशी असलेले आपुलकीचे नाते ही त्यांच्या कार्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या श्रद्धांजली सभेस माजी सभापती बबलू सेठ, सांडू पाटील, सरपंच आर. आर. पसरटे, नजीर सेठ, बाळू टेलर, चंदू सेठ, हाजी इल्यास, सैय्यद आवेस, सैय्यद मुजम्मिल, मधुकर कचोरे, सैय्यद आसिफ, ग्रामपंचायत सदस्या व कर्मचारी तसेच गावातील शासकीय कर्मचारी अब्दुल्ला खान, विसपुते, अर्शद खान, मतीन अन्सारी, विभुते यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी उपस्थित सर्वांनी स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत पवार कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो, अशी सामूहिक प्रार्थना केली. श्रद्धांजली सभा शांत, भावनिक व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
भावपूर्ण श्रद्धांजली…














